| |

हिवाळ्यात लाल खजूर खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या थंडीचा माध्यान्ह सुरु असल्यामुळे वातावरण अतिशय थंड आहे. याचा परिणाम आपल्या शरीराच्या आरोग्यावर होत असतो. साधारण थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण आपल्या खाण्या-पिण्यामध्ये बहुतांश बदल करतात. पण थंडीच्या दिवसात आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. सर्वसाधारण डाएटमध्ये सुद्धा बारीक बारीक बदल करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने शरीराला उष्णता देणाऱ्या पदार्थांचा समावेश असणे गरजेचे आहे. यासाठी सर्वात लाभदायक पदार्थ म्हणजे लाल खजूर. हा खजूर आपल्याकडे बाराही महिने बाजारात उपलब्ध असतो. शिवाय खजूर स्वभावाने उष्ण असल्याने थंडीच्या दिवसात खाणे आरोग्यदायी आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत होते. अशा स्थितीत खजूर खाणे फायदेशीर मानले जाते. कारण खजूर खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. चला तर जाणून घेऊयात खजूर खाण्याचे आरोग्यदायी फायदे –

१) रोग प्रतिकार शक्ती वाढते – दररोज खजूर खाल्ल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते. शिवाय कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, अँटी- बॅक्टेरियल, अँटी- ऑक्सिडंट असे अनेक गुणधर्म खजूरमध्ये आढळतात. ते खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

२) शरीरात ऊर्जा कायम राहते – थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी लाल खजूर खाणे फायद्याचे आहे. कारण खजूर स्वभावाने उष्ण असल्याने शरीर उबदार राहते. त्यामुळे हिवाळ्यात खजूर आपल्या आहाराचा एक भाग असणे गरजेचे आहे. तसेच खजूर दुधात घालूनही सेवन करता येते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

३) मेंदूच्या कार्यप्रणालीत सुधार होतो – लाल खजूरात कॅल्शियम, लोह आणि इतर जीवनसत्त्वे खूप जास्त प्रमाणात आढळतात. यामुळे आपली मज्जासंस्था मजबूत होते. परिणामी मेंदूच्या कार्यप्रणालीत सुधार होऊन मेंदूचे कार्य सुरळीत व सुव्यवस्थित चालण्यास मदत होते.

४) शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते – लाल खजूर लोहाचा अतिशय उत्तम स्रोत आहे. यातील लोहाचे मुबलक प्रमाण शरीरातील लाल रक्तपेशींसाठी महत्वाचे ठरते. म्हणून नियमितपणे लाल खजूर खाल्ल्याने शरीरातील लाल रक्तपेशींची संख्या वाढते. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. परिणामी ऍनिमियासारखे आजार होत नाहीत.

५) हृदय विकाराचा धोका कमी होतो – उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी लाल खजूर जरूर खा. यामुळे शरीरातील रक्तदाब नियंत्रणात राहतो. याशिवाय हृदयाशी संबंधित आजारदेखील दूर राहतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.