| |

हे पदार्थ पुन्हा गरम करून खाल, तर आरोग्याचे नुकसान करून घ्याल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। घरातल्या स्त्रियांना उरलेले अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. उरलेले अन्न फेकून देऊ नये हे कितीही मान्य असले तरीही ते पुन्हा गरम करून खाणे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे जर तुम्हीही शिळे अन्न पुन्हा पुन्हा गरम करून खात असाल तर काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

आपल्या आहारात काही असे पदार्थ असतात जे पुन्हा गरम करून खाल्ल्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. याबाबत बोलताना आहार तज्ञ म्हणतात की, फ्रिजमध्ये ठेवलेला प्रत्येक खाद्यपदार्थ पुन्हा गरम केल्यानंतर खाण्यायोग्य नसतो. हे अन्न त्याचे पौष्टिक मूल्य आणि चव गमावून बसल्यामुळे व्यक्तीला अनेक रोगांचा धोका संभवतो. चला तर जाणून घेऊयात असे कोणते पदार्थ आहेत जे पुन्हा गरम करून खाल्ल्याने शरीराच्या आरोग्यासाठी धोका वाढतो.

१) बटाटा – आहारतज्ञ म्हणतात की, सर्वात जास्त चवीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बटाटा. त्यामुळे अनेक वेळा घरांमध्ये जेवणात बटाट्याच्या पदार्थांचा समावेश हा असतोच. मात्र बटाट्याचे पदार्थ शिळे झाल्यानंतर पुन्हा एकदा खाण्यासाठी गरम केल्यास बोटुलिझमच्या दुर्मिळ जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. त्यामुळे हे पदार्थ पुन्हा गरम करून खाल्ल्याने पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो.

२) पालक – पालक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर भाजी मानली जाते. मात्र ती पुन्हा गरम करून खाणे कर्करोगाचे कारण ठरू शकते. यामुळे कर्करोगाच्या पेशींना प्रोत्साहन मिळते. परिणामी कर्करोग होण्याचा धोका वाढतो. पालक पुन्हा तापवल्यानंतर त्यात उपस्थित असलेल्या नायट्रेटचे अशा काही घटकांमध्ये रूपांतर होते, जे कर्करोगाचा धोका वाढवण्यास कारणीभूत असतात.

३) भात – रात्री भट उरला कि मग नाश्त्याला फोडणीचा भट म्हणून खाल्ला जातो. मात्र शिळा भात कोणत्याहीप्रकारे पुन्हा गरम करून खाल्ल्याने अन्न विषबाधा होऊ शकते. कारण यामुळे तांदळात बैसिलस सेरेस नावाच्या अत्यंत प्रतिरोधक जीवाणूंची उपस्थिती होते. दरम्यान तांदूळ शिजवताना हे जीवाणू नष्ट होतात, पण तांदूळ थंड झाल्यावर हे जंतू पुन्हा वेगाने वाढतात. अशा परिस्थितीत, जेव्हा एखादी व्यक्ती त्यांना पुन्हा गरम करते आणि खाते तेव्हा त्याला अन्नातून विषबाधा होऊ शकते.

४) चिकन – चिकन पुन्हा गरम करून खाणे म्हणजे आरोग्यासोबत खेळण्यासारखेच आहे. चिकनमध्ये प्रथिने भरपूर असतात. त्यामुळे त्याचे ताजे असतानाच सेवन करणे फायद्याचे ठरते. मात्र शिळे चिकन पुन्हा गरम करून खाल्ल्याने पाचन समस्या उदभवतात. शिवाय ते फ्रिजमध्ये ठेवले असेल तर ते पुन्हा गरम करून खाऊ नका.

५) अंडी – अंडी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात. शिवाय त्यात प्रथिने जास्त आढळतात. त्यामुळे त्याचे सेवन ताजे असतानाच केले पाहिजे. याबाबत आहार तज्ञ सांगतात कि, तळलेले किंवा उकडलेले अंडे पुन्हा गरम करून खाल्ल्याने आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे पोटदुखीची तक्रार संभवते.