| | |

आरोग्याच्या दृष्टीने तांदूळ शिजवण्याआधी धुण्याची गरज असते; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्या दैनंदिन आहारात तांदळाचा प्रामुख्याने समावेश केला जातो. कारण भाताशिवाय जेवण अपूर्ण आहे असे अनेकांचे म्हणणे असते. भारतासह अनेक आशियाई देशांमध्ये तांदूळ रोजच्या अन्नामधील प्रमुख पदार्थ आहे. त्यामुळे तांदळापासून बनणाऱ्या इतर पदार्थांची मागणी वेगाने वाढत आहे. तांदळात आर्सेनिक नामक विषारी घटक असण्याची शक्यता असते. यामुळे तांदूळ खाण्यापूर्वी तो निवडून, धुवून, भिजवत ठेवला जातो. याचे कारण म्हणजे, आर्सेनिक हा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांपैकी एक घटक आहे. याचा अर्थ असा की, आर्सेनिकमुळे माणसाला कॅन्सर होऊ शकतो. म्हणूनच तांदूळ शिजवण्याआधी तो धुवून स्वच्छ केला जातो.

आर्सेनिक म्हणजे काय?
– हे एक नैसर्गिक अर्ध-धातूचे रसायन आहे जे जगभर भूजलामध्ये आढळते. रसायन गिळणे, शोषणे किंवा इनहेल केल्याने याचे शरीरात सेवन होऊ शकते. आर्सेनिक विषबाधामुळे आरोग्याच्या मोठ्या तक्रारी होऊ शकतात. म्हणून जोखीम असलेल्या लोकांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.

० तांदळात आर्सेनिकचे प्रमाण किती असते?
– आर्सेनिक माती आणि पाण्यात आढळतो. त्यामुळे तांदळातही त्याचा निश्चित असा काही अंश जाण्याची शक्यता वाढते. सर्वसाधारणपणे आपल्या खाण्या-पिण्याच्या गोष्टीत आर्सेनिकचं प्रमाण बहुतांश कमी असतं. यामुळे अतिकाळजी करण्याची वेळ येत नाही. मात्र, इतर पदार्थांच्या तुलनेत तांदळामध्ये मात्र आर्सेनिकचं प्रमाण १० ते २० पटीने अधिक असतं. दरम्यान, भाताची शेती करताना पाणी जास्त वापरले जाते. अशावेळी मातीतून भाताच्या पिकात जाणं आर्सेनिकला अगदीच सोपं होतं.

– संयुक्त राष्ट्र खाद्य व कृषि संघटनेच्या मते, “जगातील एका भागाचं तांदूळ हे मुख्य खाद्यान्न आहे. यामुळे खाद्यसुरक्षेच्या दृष्टीनं तांदळाचा योग्य पुरवठा सुद्धा महत्त्वाचा आहे. आर्सेनिकसारख्या विषारी घटकाचं खाद्यान्नात असणं माणसाच्या आरोग्याला धोकादायक ठरू शकतं. यामुळे त्याला दूर करण्यासाठी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. साधारण १ किलो पॉलिश्ड तांदळात ०.२ मिग्रॅ आर्सेनिकचं कमाल प्रमाण आढळतं.

० आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी किती भात खाणं सुरक्षित आहे?
– याचे एक विशिष्ट उत्तर नाही. मात्र उपलब्ध माहितीच्या आधारे अंदाज लावला असता, आर्सेनिकचं प्रमाण कमी जोखमीच्या कॅटेगरीत मोडतं. फूड स्टँडर्ड्स एजन्सी या अमेरिकन संस्थेच्या अहवालानुसार, ७० किलोहून अधिक वजनाच्या वयस्कर व्यक्तीसाठी १०० ग्रॅम तांदूळ पुरेसे आहेत. मात्र, या आकड्यांना रोजच्या अन्नाच्या लक्ष्याप्रमाणे हाताळणे कठीण आहे. कारण, खाण्या-पिण्याच्या इतर गोष्टींमधून आर्सेनिक आपल्या शरीरात पोहोचू शकतं. यामुळे कोणत्याही इतर खाद्यान्नाप्रमाणेच तांदूळही संतुलित आहाराचा भाग असायला हवा.

महत्वाचे – जे लोक रोजच्या आहारात जास्त तांदळाचा वापर करतात, त्यांच्यासाठी हि बाब धोकादायक आहे. मात्र, जर तुम्ही तांदूळ रात्रीच पाण्यात भिजवून ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी स्वच्छ धुवून शिजवत असाल, तर आर्सेनिकचं प्रमाण निश्चित स्वरूपात कमी होतं. शिवाय भात उकळतानाही पाणी बदलल्यास आर्सेनिकचं प्रमाण कमी होते.