|

लग्नामध्ये वधूच्या हातावर मेहंदी का काढतात?; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लग्न म्हणजे एक सोहळा.. आनंदाचा क्षण.. मनात चलबिचल करणारी भावना आणि समाजाला जोडणारे तत्त्व असते. एखाद्या घरात लग्न असेल तर घरातील वातावरण अतिशय प्रफुल्लित करणारे असते. पाहुण्यारावळ्यांची ये जा, अंगणात भव्य मांडव, घराच्या प्रवेशद्वारावर केळीचे खांब, चविष्ट पदार्थांचा घमघमाट, गोडाधोडाच्या पदार्थांचे डब्बेच डब्बे आणि लहान मुलांची मध्येमध्ये लुडबुड. या सगळ्यात ज्या दोन व्यक्तींसाठी हि सारी गडबड सुरु असते त्यांची मनं मात्र अस्थिर असतात. साहजिकच जेव्हा दोन व्यक्तींचे लग्न होते तेव्हा दोन कुटुंब एक होत असतात. त्या मुला-मुलीच्या जबाबदाऱ्या आणि प्राधान्य देण्याच्या गोष्टींमध्ये बदल होत असतो. नवी नाती जोडली जात असतात जी कायमस्वरूपी आपली करायची असतात. त्यामुळे थोडं का होईना घाबरट मनं नवरा नवरीला डिवचतचं.

आपल्या भारतीय परंपरेत विवाह सोहळा म्हणजे महिन्याभराची लगीन घाई. यात विविध कार्यक्रमांचा समावेश असतो. अगदी तांदूळ निवडणे, मसाले – गोडाचे पदार्थ बनविणे, मानपान, पाहुण्यांच्या याद्या, नवरा नवरीची कपड्यांपासून दागिन्यांपर्यंतची खरेदी, साखरपुढा, मेहंदी, हळद आणि मग लग्न. हुश्श.. फक्त विचारांनीच केवढं गलबलायला होतं. पण तुम्हाला या सगळ्यात कधी असा प्रश्न पडला आहे का? कि लग्नामध्ये वधुच्या हातावर मेहंदी का काढतात? काय तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर ठाऊक आहे? नाही? मग अजिबात वेळ न घालवता चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

० वधूच्या हातावर मेहंदी कश्यासाठी ?

– आता आपल्यापैकी अनेक जण म्हणतील कि या प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्प आहे. हे उत्तर म्हणजे, नवरीच्या हातावरील मेहंदीचा रंग जितका गढद चढतो तितके तिच्या जोडीदाराचे प्रेम अधिक दृढ असते. खरंतर हा एक समज आहे किंवा याला आपण थट्टेचा भाग समजू.

– याशिवाय अनेक लोक सांगतात कि, जितके जास्त दिवस नवरीच्या हातावर मेहंदी टिकते तितके जास्त तिला सासरी प्रेम मिळते.

– तसेच, वधूच्या तळहातामागे काढलेली मेहंदी तिचे व तिच्या पतीचे संकटापासून रक्षण करते तर तळहातावरील फुलांची नक्षी तिच्या नवविवाहित आयुष्याच्या सुख-समृद्धीची प्रतिके असतात.

अशा कितीतरी समजुती आपण गेली कित्येक वर्षे उराशी बाळगून जगत आहोत. आता यामागे प्रत्येकाच्या भावना असल्यामुळे हि प्रत्येक समजूत आपल्यासाठी विशेष आहे. असे असले तरीही वधूच्या हातावर मेहंदी काढण्यामागे काही विशेष कारणे आहेत जी आपल्यापैकी अनेक लोकांना माहित नाहीत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) मेहंदी स्वभावाने थंड असल्यामुळे शरीरातील उष्णता खेचून घेते आणि शरीराचे तापमान संतुलित करते.

२) लग्न म्हटलं कि ताण-तणाव आलाच आणि यावर मेहंदी प्रभावी आहे. म्हणून वधूचे मन शांत करण्यासाठी मेहंदी काढली जाते.

३) लग्नापूर्वी वधूच्या मनात संमिश्र भावना असते. यामुळे तिच्या कृती अस्थिर होतात. अशावेळी मेहंदीतील विविध नक्षीकाम वधूचे मन एकाग्र करून स्थिर करण्याचे काम करते.

४) तसेच मेंहदीला येणारा उग्र सुवास लग्नानंतरच्या प्रेममय वातावरणाला प्रोत्साहित करतो आणि जोडीदाराला आकर्षित करण्याचे कार्य करतो.