| | |

योग्यवेळेत पौष्टिक नाश्ता हीच मधुमेहींच्या आरोग्याची गरज; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह हा असा आजार आहे जो वाटतो सर्वसाधारण पण आहे गंभीर. कारण आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण किंचितही वाढले असता मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णाला त्रास होण्याची शक्यता असते. मुख्य सांगायचे म्हणजे आपल्या भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या रोज दिवसाला सतत वाढत आहे. यामुळे आजकालची बदलती शैली पाहता मधुमेहाने अनेको लोकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मधुमेहींनी स्वस्थ राहण्यासाठी आपल्या आहाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असते. यामागे कारणही आहे. ते म्हणजे योग्य आहाराच्या मदतीने रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवून मधुमेहापासून मुक्तता मिळू शकते. पण यासाठी अर्थात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेहींनी विशिष्ट वेळेत नाश्ता आणि जेवण केले पाहिजे. सांगायची महत्वाची बाब म्हणजे हि ठरवलेली वेळ मोडता काम नये. चला तर जाणून घेऊयात मधुमेहींच्या नाश्त्याची योग्य वेळ खालीलप्रमाणे:-

० नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, मधुमेहींनी सकाळी ८ .३० च्या आधी नाश्ता केला पाहिजे. कारण एका संशोधनानुसार, रक्तातील साखरेची पातळी आणि इन्सुलिन प्रतिरोध हे सहभागी झालेल्यांमध्ये दिसून आले. इन्सुलिनच्या प्रतिकारामुळे शरीर इन्सुलिन हार्मोनला प्रतिसाद देऊ शकत नाही, ज्यामुळे रक्तातील साखर वाढते. त्यामुळे आपण किती प्रमाणात किंवा किती वेळ खातो त्याचा फारसा परिणाम होत नाही. मात्र, कोणत्या वेळी खातो याचा आपल्या रक्तातील साखरेवर जास्त परिणाम होतो. याशिवाय मधुमेहींनी आपल्या नाश्त्यामध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश केल्यास त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहील हे देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

सकाळचा नाश्ता टाळल्याने संपूर्ण दिवसभरामध्ये ब्लड शुगर लेव्हल्समध्ये चढ उतार सुरु रहात असल्याचे विज्ञानाने सिद्ध केले आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता अतिशय आवश्यक आहे. तसेच जे अन्नपदार्थ ‘लो ग्लायसेमिक इंडेक्स’ असणारे आहेत, त्यांचा आहारामध्ये समावेश असावा. हे पदार्थ हळू हळू पचत असल्याने शरीरातील ब्लड शुगर लेव्हलस एकदम वाढू देत नाहीत. त्यामुळे मधुमेहींनी सकाळच्या नाश्त्यासाठी खालील अन्नपदार्थांचा वापर करावा.

१) ओटमील – मधुमेहाचे रुग्ण नाश्त्यात ओटमील खाऊ शकतात. कारण त्यात असलेले फायबर रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते.

२) मूग डाळ – मूग डाळीच्या ग्लायसेमिक इंडेक्समध्ये खूप कमी पातळी आहे, याचा अर्थ असा की यामुळे रक्तातील साखर वाढत नाही.

३) दलिया – दलिया प्रथिनयुक्त असून त्यात आढळणारे मॅग्नेशियम इन्सुलिन हार्मोनला प्रोत्साहन देणारे एंजाइम तयार करण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहींनी दलिया खाणे आरोग्यवर्धक ठरेल.

४) अंडी – अंड्यांमध्ये कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स खूप कमी असतात. त्यामुळे हे उच्च प्रथिनयुक्त अन्न आहे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि मधुमेहावर नियंत्रण राहते.

५) दही/ताक – याशिवाय मधुमेही सकाळच्या नाश्त्यामध्ये ताजे दही, ताक, यांचा ही समावेश करू शकतात. कारण हे पचायला हलके असते.

६) धान्ये – नाचणीचे आंबील, निरनिराळ्या डाळी वा कडधान्ये वापरून बनविलेले धिरडे यांसारखे पदार्थही नाश्त्यामध्ये समाविष्ट करता येतील. कारण यांमध्ये भरपूर प्रथिने आणि मुख्य म्हणजे फायबर असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते.

७) भाज्या व फळे – पालेभाज्या, एखादे फळ, आणि लो फॅट दुध वापरून साखर न घालता बनविलेली स्मूदीदेखील मधुमेहींसाठी उत्तम नाश्ता मानता येईल. कारण यामुळे शरीराला आवश्यक ती सर्व पौष्टिक तत्वे आणि फायबरही मुबलक मात्रेमध्ये मिळते.