रात्रीचे जेवण टाळण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या दुष्परिणाम
हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेक लोक फिटनेसच्या बाबतीत इतके कडक आणि कठोर नियम पाळतात कि काही विचारू नका.. यात इंटरमिटंट फास्टिंग करणाऱ्या पुरुष आणि महिला वर्गाची संख्या फार मोठी आहे. ज्यात तब्बल १२ तास पोट रिकामी ठेवले जाते. शिवाय वजन वाढू नये म्हणून योगासने, व्यायाम ते डाएटिंग इथपर्यंत सर्वांची मजल अगदी सहज जाते. पण अशा पद्धतीने वजन कमी करणे अनेकदा आरोग्यासाठी नुकसानदायी ठरते.
![](https://helloarogya.com/wp-content/uploads/2022/03/HelloArogya-2022-03-08T174054.041-1024x534.jpg)
आता बघा ना आजकाल दिवसातून एक वेळ खाण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्यामुळे बरेच लोक रात्रीचे जेवण करतच नाहीत. पण, रात्री जेवण न केल्याने होणारे दुष्परिणाम जाणून न घेता तुम्ही जर हा ट्रेंड फॉलो करत असाल तर तुम्ही स्वतःहून आरोग्याचे नुकसान करत आहात.
रात्रीचे जेवण टाळू नये कारण,
असे केल्यास शारीरिक कमकुवतपणा आणि थकवा येण्याची शक्यता असते. विशेषत: अनेक दिवस सतत रात्रीचे जेवण टाळल्यास त्याचा परिणाम थेट आंतरक्रियांवर होतो आणि परिणामी आरोग्याचे नुकसान होते. यामुळे शारीरिक ऊर्जा कमी होते. चयापचय क्रिया बिघडते. स्नायूंचे दुखणे वाढते. शिवाय अनिद्रेचा त्रास संभवतो.
रात्रीचे जेवण टाळल्यास होणारे दुष्परिणाम
![](https://helloarogya.com/wp-content/uploads/2022/03/HelloArogya-2022-03-08T173913.945-1024x534.jpg)
शरीरात पोषक तत्वांची कमतरता – रात्रीचे जेवण आपल्या दैनंदिन आहार चक्राचा अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण दिवसभरातील चार मुख्य आहारांमधून आपल्याला आवश्यक ते पोषण मिळत असते. त्यामुळे रात्रीचे जेवण टाळल्यास शरीरात पोषक घटकांची मात्रा कमी होते. नियमित एकवेळ जेवण टाळल्यामुळे शरीरात पोषक तत्त्वांचा साठा मर्यादित प्रमाणात राहतो ज्यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो.
![Immunity](https://helloarogya.com/wp-content/uploads/2022/02/HelloArogya-2022-02-22T161438.965-1024x534.jpg)
रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम – वजन कमी करताना रात्रीचे जेवलं टाळले असता शरीराला पूर्ण पोषण मिळत नाही. त्यामुळे साहजिकच शरीरात पोषक तत्वांची कमतरता निर्माण होते. याचा परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. इतकेच नव्हे तर अशक्तपणा, चक्कर येणे, अर्धशिशी आणि सतत आजारी पडण्याची शक्यता वाढते.
![](https://helloarogya.com/wp-content/uploads/2022/03/HelloArogya-2022-03-08T173801.969-1024x534.jpg)
शारीरिक उर्जा पातळी कमी होते – नियमित ठरलेली कामे वेळेवर आणि उत्तमरित्या करायची असतील तर साहजिकच आपल्या शरीरात ऊर्जेचा साठा आवश्यक तितका असायला हवा. तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यामध्ये अनेक तासांचे अंतर असते. यामुळे रात्रीचे जेवण न केल्याने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. परिणामी शरीरात थकवा आणि सुस्तपणा जाणवतो. सोबतच शरीराला पुरेसे पोषक तत्व न मिळाल्याने अशक्तपणाही येतो.
![](https://helloarogya.com/wp-content/uploads/2022/03/HelloArogya-2022-03-08T173715.053-1024x534.jpg)
अनिद्रेचा त्रास होतो – वजन कमी करण्यासाठी रात्री हलके जेवण घ्या पण जेवण टाळू नका. कारण रात्रीचे जेवण न केल्यास भूक हळूहळू संपते. पण यामुळे झोपताना रिकाम्या पोटी गॅस तयार होतो. परिणामी पोटाच्या समस्या वाढतात आणि यामुळे झोप लागत नाही. हळूहळू नियमित झोप मोड होते आणि कालांतराने अनिद्रेचा त्रास संभवतो.