| | |

पित्त असो वा मुतखडा आंब्याचे पानं देई आराम; जाणून घ्या गुणकारी लाभ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आंबा म्हणजे फळांचा राजा. असा एकही व्यक्ती नसेल ज्याला आंबा खाणे आवडत नाही. आंबा एका विशिष्ट हंगामात येतो. यामुळे आंब्याची चव त्याच्या हंगामात चाखण्याची मजाच काही और आहे. मुख्य म्हणजे इतर फळांप्रमाणे आंबा खाल्ल्यानेही अनेक आरोग्यदायी लाभ होतात. यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आंब्याच्या हंगामात आंबा खावा. पण तुम्हाला माहिती आहे का आंब्याइतकेच त्याचे पानही आरोग्यदायी आहे. हो. हो. आंब्याचे पान. कारण, आंब्याच्या पानांत बरेच औषधी गूण आहेत. जे आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम आहेत.

आंब्याच्या पानांचे फायदे इतके वैविध्यपूर्ण आणि व्यापक आहेत कि आरोग्याची चिंता असेल तर आंब्याची पाने जरुरी आहेत. हि पाने जेव्हा उमलतात तेव्हा या पानांचा रंग लालसर जांभळा असतो. त्यानंतर हि पाने हळहळू हिरव्या रंगात वाढतात. आंब्याच्या पानांमध्ये अ, ब, आणि सी जीनवसत्वासह अनेक पौष्टिक घटक समाविष्ट असतात. आंब्याच्या पानांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोल्सची मात्रा जास्त असल्याने त्यांना अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. चला तर जाणून घेऊयात आंब्याच्या पानांचे औषधी फायदे काय आहेत ते खालीलप्रमाणे:-

१) पित्त आणि मुतखड्यावर परिणामकारक – आंब्याच्या पानांचा पित्त आणि मुतखड्याच्या त्रासावर अत्यंत महत्वाचा उपयोग होतो. मुख्य म्हणजे, हि पाने पित्त आणि मुतखडाचा आजारावर कमी वेळात अधिक आराम देतात. यासाठी फक्त आंब्याच्या पानांची बारीक पावडर पाण्यासोबत दररोज घ्या. यामुळे पित्ताचा त्रास शमतो आणि मूतखडा बाहेर पडण्यास मदत होते.

२) उच्च रक्तदाब पातळी नियंत्रित – आंब्याची पाने रक्तदाब कमी करण्यास सहाय्यक असतात. यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून या पाण्याचे सकाळ संध्याकाळ सेवन करावे. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतोच, याशिवाय आंब्याची पाने रक्तवाहिन्या मजूबतदेखील बनवतात.

३) श्वसनसंस्थेच्या समस्या दूर – अस्थमा, सर्दी आणि ब्राँकायटिस ग्रस्तांसाठी आंब्याची पाने गुणकारी आहेत. यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून घ्या आणि मधासोबत प्या. हे उकळलेले पाणी प्यायल्याने खोकल्यावरदेखील आराम मिळतो. याशिवाय आवाज बसला असेल तरीही हे पाणी पिणे लाभदायक आहे.

४) मधुमेहावर नियंत्रण – आंब्याची पाने मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. कारण आंब्याच्या कोवळ्या पानात टॅनिन असते. त्यात अँथोसॅनिडीन्स असतात. यामुळे मधुमेहाच्या प्राथमिक स्तरावर आंब्याची पाने फार गुणकारी ठरतात.

५) पोटासाठी फायदेशीर – पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येवर आंब्याची पाने गुणकारी आहेत. यासाठी कोमट पाण्यात आंब्याची पाने घालून रात्रभर तशीच ठेवा. पुढे, दुसऱ्या दिवशी हि आंब्याची पाने असलेले पाणी ढवळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. असे केल्यास पोट साफ होण्यास मदत होते. शिवाय हे पाणी दिवसभर प्यायल्याने टॉक्सिन शरिराबाहेर फेकले जाते आणि पोट साफ राहते.

६) कानदुखीवर गुणकारी – कान दुखीवर आंब्याची पाने गुणकारी आहेत. त्यामुळे कान दुखत असतील तर आंब्याच्या पानाचा रस काढा. पुढे एक चमचा आंब्याच्या पानाचा रस कानात २ थेंब घाला. यामुळे लगेच कानदुखीवर आराम मिळतो.

७) त्वचा आणि केसांसाठी लाभदायक – आंब्याच्या पानांचा अर्क त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. आंब्याच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंटमुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात. तसेच केसांची वाढ होत नसेल तर आंघोळीच्या पाण्यात आंब्याची पाने घालून त्या पाण्याने केस धुवा. यामुळे केसांची वाढ होते, केस मजबूत आणि मुलायमदेखील होतात.