| | | |

पाणी अर्थात जीवन असे का म्हणतात?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पाणी म्हणजे जीवन. अगदी लहानपणी विज्ञानाच्या पुस्तकातदेखील आपण हे वाचलं असाल आणि याचा प्रत्यय नक्कीच दैनंदिन जीवनात अनुभवत असाल. शरीराला आवश्यक तितके पाणी न मिळाल्यास कितीतरी अडचणींना सामोरे जावे लागते हे काही तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. मुळात आपल्या निरोगी आरोग्यासाठी नियमित व पुरेसे पाणी पिणे आवश्‍यक आहे. याचे कारण म्हणजे, शरीरामध्ये ६०% टक्के पाणी असते. यामुळे शारीरिक आंतरक्रिया सुरळीत चालण्यासाठी हे संतुलन अत्यंत गरजेचे असते. याशिवाय लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्वाचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थांचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्‍यक आहे. म्हणूनच आयुर्वेदातही पाण्याचा उल्लेख जीवन असा केला आहे.

० डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, पुरुषांसाठी दिवसाला १५.५ कप अर्थात ३.७ लिटर आणि महिलांसाठी दररोज सुमारे ११.५ कप अर्थात २.७ लिटर इतके पाणी पिणे अत्यंत गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊयात दररोज शरीराला आवश्यक इतके पुरेसे पाणी प्यायल्याने कोणते फायदे होतात ते खालीलप्रमाणे:-

१) शरीराला आवश्‍यक एवढ्या पाण्याचे सररोज सेवन केल्यास डोकेदुखी, अर्धशिशी किंवा उष्माघाताचा समस्यांचा त्रास होत नाही.

२) बध्दकोष्ठता हा अत्यंत सर्वसाधारण आजार असून तो कुणालाही होऊ शकतो. परंतु जास्तीत जास्त पाणी प्यायल्यास बध्दकोष्ठतेचा आजार दूर होऊ शकतो.

३) सामान्यपणे दिवसातून ३-४ लिटर पाणी प्यायल्यास उन्हाळ्यात शरीराचे तापमान संतुलित राहते. यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत. तसेच पचनाचे विकार होण्याची शक्यता मिटते.

४) पाण्यामुळे चयापचय प्रक्रिया सुरळीत सुरु राहते. परिणामी खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते आणि अपचन, गॅस यासारखे त्रास होत नाहीत. सकाळी उठल्यानंतर कोमट पाणी पिल्यास दिवसभर पचनास त्रास होत नाही.

५) जेवणाच्या आधी पाणी प्यायल्याने वजन कमी होते. तर जेवणादरम्यान प्यायल्याने वजन नियंत्रित राहते. याशिवाय जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी प्यायल्यास वजन वाढते. तसेच बाहेरून आल्यास लगेच पाणी पिऊ नये, असे तज्ञ सांगतात.

६) आपल्या त्वचेमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असून शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी त्वचा संरक्षणात्मक म्हणून पाणी काम करते. यामुळे दररोज गरजेइतके पाणी प्यायल्यास त्वचा सुंदर आणि टवटवीत दिसते.

७) शरीरातील पाणी कमी झाल्यास त्वचा कोरडी होऊन अकाली सुरकुत्या पडतात. परंतु दररोज शरीराच्या आवश्यकतेनुसार पाण्याचे सेवन केल्यास त्वचेसंबंधित विकारांमध्येही फायदा होतो आणि त्वचा तजेलदार, तुकतुकीत, डाग विरहित आणि विना सुरकुत्या दिसू लागते.