| | | |

तुमचा हर्बल ग्रीन टी दुप्पट हेल्दी होऊ शकतो; कसा? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। ग्रीन टी हे एक असे पेय आहे जे जगभरातील अनेक लोक आपल्या दैनंदिन आयुष्यात आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्राधान्यपुर्वक वापरतात. ग्रीन टी म्हणजे हिरव्या रंगाची लहान लहान पाने असलेली वनस्पती. जिचे रासायनिक नाव कमेलिया सिनेसिस असे आहे. ग्रीन टी चे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे आज ग्रीन टीचा सर्रास वापर केला जातो. कारण ग्रीन टी हे पेय अगदी वजन कमी करण्यापासून ते चयापचय क्रिया सुरळीत होण्यापर्यंत मदतशीर आहे. शिवाय यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. तर यातील पोषक तत्वांव्यतिरिक्त भरपूर दाहक-विरोधी गुणधर्म देखील असतात. असा हा ग्रीन टी आजकाल अनेकजण आवडीने पितात. पण, ग्रीन टीची पौष्टिकता आणखी वाढवायची असेल तर त्यात काही आपल्या ओळखीतले पदार्थ मिसळता याविषयी किती जणांना माहिती आहे? तुम्हाला माहितेय? नाही ना? म्हणून आज आम्ही तुम्हाला अश्या पदार्थांविषयी सांगणार आहोत ज्यांच्या सहाय्याने तुम्ही हर्बल ग्रीन टी’मधील पोषण मूल्य अधिक वाढवू शकता. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

१) स्टीव्हियाची पाने – ग्रीन टीमध्ये स्टीव्हियाची पाने उकळून रोज प्या. यामुळे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या मोठमोठ्या आजारांना टाळता येते.

२) आलं – ग्रीन टीमध्ये आल्याच्या रसाचे २ थेंब टाकले असता प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते. आल्याचा रस ग्रीन टीची चव वाढवतोच शिवाय कॅन्सरपासून बचावदेखील करतो.

३) पुदिना – ग्रीन टीमध्ये पुदिन्याची पाने घातली असता शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत होते. शिवाय पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनक्रियाही सुधारते.

४) लिंबू – ग्रीन टीमध्ये लिंबाचा रस मिसळून प्या. यामुळे ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट गुणधर्म वाढतात आणि त्वचा चांगली राहते.

५) दालचिनी – ग्रीन टीमध्ये चिमूटभर दालचिनी पावडर टाकून प्यायल्यास अधिक काळ पोट भरलेले राहते. यामुळे पहिला फायदा म्हणजे अतिरिक्त खाणे टाळले जाते ज्यामुळे वजन कमी होते. शिवाय रोग प्रतिकार शक्तीही वाढते.

६) काळीमिरी – वास्तविक, काळीमिरीची पावडर शरीरातील कॅलरीज कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामुळे हर्बल टी सोबत काळीमिरीची चिमूटभर पावडर मिसळून खाल्ल्यास वजनही कमी होते आणि मधुमेहींना लाभ होतो .

७) मध – ग्रीन टी मध्ये मध नैसर्गिक साखर म्हणून कार्य करते. यासोबतच त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आपल्याला निरोगी ठेवण्याचं काम करतात. यामुळे शरीराचे आरोग्यच नव्हे तर त्वचादेखील चमकते.